प्रास्ताविक
आपले जीवन बातम्यांनी व्यापले आहे. आपण आकाशवाणीवरील बातम्या ऐकतो, दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहतो आणि ऐकतो. वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील जिज्ञासा संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. बातमी ज्या प्रसंगावर आधारित असते, त्या पलीकडील वाचकांची जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रास करावा लागतो. वर्तमानपत्राचा उद्देश माहिती देणे, लोकजागृती करणे, लोकशिक्षण करणे, मनोरंजन करणे हा आहे. बातमीत जे घडले, ते जसे आहे तसेच द्यावे लागते. बातमीत ‘मी’ असत नाही, तर घडलेली घटना ‘जशी आहे’ ‘तशी देणे’ ही बातमीची गरज असते; परंतु बातमीत न आलेली रंजक, नावीन्यपूर्ण माहिती आणि तिचे सूक्ष्म धागेदोरे व वेगवेगळे तपशील हे वाचकांना वृत्तलेखात वाचावयास मिळतात.
■ अर्थ आणि स्वरूप
अनेकदा बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते. मात्र बातमीत तो देता येत नाही. त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो. त्याला इंग्रजीत ‘फिचर’ असे म्हणतात. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात त्याचा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. त्याचा भावार्थ ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही’ असा होतो. वर्तमानपत्राचा जन्म पाश्चात्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतीय वृत्तपत्रात देखील रूजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. आता वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची आणि वाचकांची गरज बनली आहे.
बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्यासंबंधीचा तपशील, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख लिहिला जातो. फिचर म्हणजे ‘नॉन न्यूज’ असे म्हटले जात असले तरी वृत्तलेखाचा संबंध नेहमीच बातमीशी असतो. वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो. त्याला काही निमित्त असावे लागते. वृत्तलेख
हा घडलेल्या, घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असला तरी त्यामधील अचूकतेला महत्त्व असते. हे लेखन वास्तवावर आधारित असल्याने त्यात कल्पकतेला फारसा वाव नसतो. खरेतर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे यांतून वाचकांचे समाधानही महत्त्वाचे ठरते.
वृत्तलेख स्वतंत्र असतो. त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. तसेच तो आकर्षकही असतो. वृत्तलेखाची भाषादेखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते. वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी, त्यांना आपलीशी वाटणारी, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी, कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी असते. सातत्यपूर्ण लेखन सरावानंतर ती कमवता येते. वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा, माहिती देणारा, ज्ञान देणारा, मनोरंजन करणारा असतो. वाचकाला त्यात रस असतो, हे लेखन त्याची उत्सुकता वाढवणारे असते. वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली, वाचकांच्या विचाराला चालना देणारी असते. वाचकांच्या विचाराला धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. मांडणी अत्यंत मुद्देसूद असते. आपल्या लेखातील मुद्द्यांच्या समर्थनार्थ माहितीशी संबंधित आलेख, नकाशा, छायाचित्र, व्यंगचित्र, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो. वृत्तलेख लिहिताना लिहिणारा स्वतःचा अनुभव आणि त्या विषयांच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.
■ वृत्तलेखांचे प्रकार
विषय आणि लेखन प्रकारानुसार वृत्तलेखाचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
(अ) बातमीवर आधारित वृत्तलेख- एखाद्या घटनेच्या, बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे, त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते , तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण केले जाते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी, स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून, घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो. उदा., पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण-कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, दळणवळणावरील गुंतवणूक, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम.
(आ) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख – अशा प्रकारच्या लेखात जसे असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीवर लिहिले जाते तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असलेल्या सामान्य माणसाबद्दलदेखील लिहिले जाऊ शकते. एखाद्या क्षेत्रात मिळवलेले देदिप्यमान यश, केलेला संघर्षव प्रयत्नांची पराकाष्ठा, एखाद्या समस्येवर मात करताना केलेला उपक्रम, कृती, केलेला विक्रम या संदर्भात वृत्तलेख लिहिले जातात. औचित्य साधून या प्रकारचे लेख लिहिले जातात. अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार, गौरव, वाढदिवस, अमृत महोत्सव, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाताे. या प्रकारातील वृत्तलेख लिहिताना त्या व्यक्तीसंबंधी झालेले पूर्वीचे लेखन, चरित्र, आत्मचरित्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्ती, सहकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन देखील या प्रकारचे वृत्तलेख उत्तम स्वरूपात तयार करता येतात. वाचकांच्या पुढे केवळ जीवनपट मांडणे अपेक्षित नसते. आकडेवारी, सनावळ्या, परिचय एवढ्यापुरते ते लेखन मर्यादित नसते. त्यामध्ये त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, दृष्टिकोन, खास शैली, सवयी, वैशिष्ट्ये असा व्यक्तिगत स्पर्श असतो. भावनिक स्पर्श हे अशा प्रकारच्या लेखाचे वैशिष्ट्य असते. उदा., पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.
(इ) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख- विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असतात.प्रसारमाध्यमांसाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतीचा भाग लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली,त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी निवडलेले क्षेत्र, एखादा अविस्मरणीय प्रवास, स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेले अभूतपूर्व यश, अनुभव या संदर्भाने त्यात मांडणी केली जाते. सर्वसाधारण लोकांना जे माहीत आहे त्यापेक्षा वेगळे काही मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या लेखात केला जातो. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची स्वतःची म्हणून जी काही भूमिका असते ती या प्रकारच्या वृत्तलेखातून मांडली जाते.त्यातून त्या माणसाच्या कर्तृत्वाची उंची व संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो.उदा., गिर्यारोहक, संशोधक, नामवंत लेखक, कवी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या मुलाखतींवर आधारित लेख इत्यादी.
(ई) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख- गावे, स्थळे, वास्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात. काही ठिकाणी संशोधन करताना उत्खनन होत असते. संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट आदी संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असते. अनेकदा संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखाद्या वास्तूकिंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. त्या नव्या माहितीच्या संदर्भात प्राचीन माहितीचा उपयोग करून लेख लिहिता येतो. ग्रामीण पंरपरेतील लोकसाहित्याच्या संदर्भांचा अभ्यास करून मांडणी करता येते. लिहिणारी व्यक्ती त्या स्थळाला भेट देते. त्याने जे पाहिले, अनुभवले त्या बाबतीत तो वृत्तलेख लिहिला जातो. एखाद्या इतिहास तज्ज्ञाशी झालेली चर्चा, त्यांचे व्याख्यान आणि त्यातून मिळालेल्या नव्या माहितीचा उपयोग करून ऐतिहासिक वृत्तलेख लिहिला जातो. अशा स्वरूपाच्या वृत्तलेखाची गरज म्हणून नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा देखील वापर करता येतो.उदा., अहमदनगर शहर, भुईकोट किल्ला, शनिवार वाडा, हेमाडपंथीय मंदिरांचे शिल्पकाम इत्यादी.
(उ) नवल, गूढ, विस्मय इत्यादींवर आधारित वृत्तलेख- एखादी विस्मयकारक घटना, कृती, निसर्गातील नवलाई या संबंधीच्या अनुभवांवर आधारित हा लेख असतो. एखाद्या परिसरातील निसर्गाचे दृश्य हा जसा वृत्तलेखाचा विषय ठरतो त्याप्रमाणे एखादे गूढ, निसर्गातील एखादा चमत्कार हा देखील वृत्तलेखाचा विषय ठरतो. मात्र यासंबंधी लेखन करतांना आपण ज्यावर लिहीत आहोत त्या संबंधीची शहानिशा करणे, त्या संदर्भातील माहिती पारखून घेणे, चिकित्सा करणे आवश्यक ठरते. यामधील माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची असते. उदा., सांगलीत नदीच्या महापूराच्या पाण्याची पातळी ५८ फूट, हिमालयातील निसर्ग, रांजणखळगे, मोठा अपघात होऊनही एखाद्या बालकाचा प्राण वाचणे, डोक्यावरून पाणी वाहून जगवली वीस हजार झाडे.. इत्यादी स्वरूपाच्या घटना वृत्तलेखाचे विषय होतात. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरूचीचे विषय, खाद्यसंस्कृती इत्यादी विषयांवरही वृत्तलेख लिहिले जातात.
■ वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात?
वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला भेटणाऱ्या व्यक्ती, प्रवास, अनुभव, निरीक्षण, विविध वर्तमानपत्रांतील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळे, दूरचित्रवाणी या सारखी विविध साधने ही आपल्याला वृत्तलेख लिहिण्यासाठीचे विषय मिळवून देत असतात. वृत्तलेखासाठीच्या विषयांचे स्रोत पुढील गोष्टींतून मिळू शकतात.
(१) बातमी- वर्तमानपत्रात प्रकाशित होणारी बातमी, नियतकालिकात लिहिले गेलेले विशेष वृत्त/वृत्तमाला वाचल्यानंतर; तसेच दूरचित्रवाणीवर दाखविलेली घटना पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने मनात वृत्तलेखासंबंधी विचारांचे बीज तयार होत असते. त्या बातमीच्या मागे असलेल्या गोष्टी, संदर्भ, मुलाखत घेऊन त्या बातमीच्या संबंधाने उत्तम वृत्तलेखाची निर्मिती करता येते. बातमीकडे विविध अंगांनी पाहिले आणि त्या घटनेचा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वृत्तलेखासाठी अनेक विषय सहज मिळू शकतात.उदा., “विजेशिवाय वाहनांच्या ट्यूबचे पंक्चर काढणे” अशी बातमी प्रकाशित झाल्यावर पंक्चर नेमके कसे काढले जाते? असे का करावे वाटले? त्यामागील प्रेरणा कोणती? त्यामुळे काय परिणाम साधला जाणार आहे? लोकांची सोय, विजेची बचत, त्यातून मिळालेला रोजगार अशा अंगाने हा वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो.
(२) व्यक्तिगत अनुभव- पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला अनेक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते.बातमी मिळवताना अनेक अनुभव मिळत जातात. त्यातील काही अनुभव बातमीला मदत करतात. तर काही केवळ अनुभवाची शिदोरी वाढविण्यास मदत करतात; पण ते अनुभव वाया जात नाहीत. गतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे ठरतात.‘बसस्थानकावरील फेरीवाल्यांच्या संघटनेची स्थापना’ अशी बातमी जेव्हा येते, तेव्हा त्यावर वृत्तलेख लिहितांना फेरीवाल्यांची संख्या, त्यांच्या व्यवसायातील कष्ट, वेळ, त्यांच्या कुटुंबांचे उदरभरण, रोजगाराचे उत्पन्न अशा मुद्द्यांवर वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. यात केवळ तपशीलाची नोंद अपेक्षित नसते तर त्यामधून त्यांच्या
जीवनानुभवाचे दर्शन घडणे आवश्यक असते.
(३) भेटीगाठी/संभाषण- पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला उत्तम लिहिता येण्यासाठी त्याचे भाषाज्ञान उत्तम हवे. तसेच व्यवसायाची गरज म्हणून उत्तम संवाद कौशल्य हवे असते. त्याला अनेक क्षेत्रात जाऊन बातमी मिळवावी लागते. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधावा लागतो, तर कधी शेतकरी, शेतमजूर, कलाकार, खेळाडू, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, लोकप्रतिनिधी यांच्याशी बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करावा लागतो. कधी कधी काही माणसे बोलत नाहीत तेव्हा त्यांना बोलते करण्याचे कौशल्य पत्रकारांकडे असावे लागते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय सहजतेने मिळून जातात. या संभाषणातून एखाद्या व्यक्तीचे अनेक पैलू सहजतेने समोर येतात.विदर्भातील जमीन विकून भाताच्या जातीचे संशोधन करणारे दादाजी खोब्रागडे यांची शोधकथा वृत्तलेखासाठी विषय देऊन जाते. एखादा अधिकारी अशी घटना सहजपणे चर्चेत सांगून जातो. अशा व्यक्तींना, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांना प्रत्यक्ष भेटून आणखी काही पैलू समोर येतात.
(४) निरीक्षण- पत्रकाराने चौकस असायला हवे. पत्रकाराला बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात. वृत्तलेखासाठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. त्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधता येणे व वृत्तलेखाचे विषय निवडता येणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात.
अंत्यविधीच्या ठिकाणी ‘प्रेत जाळण्याचे काम करणारी महिला’ ही बातमी आहे; पण त्या बातमीची अधिक माहिती घेतली तर आपल्याला वृत्तलेखाचा विषय मिळू शकतो. ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणंसाचा वापर’, ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘बांधकामाचे साहित्य वरती नेण्यासाठी टाकाऊ मोटारसायकलाचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आपण पाहात असतो. त्यामधून वृत्तलेखाचे विषय मिळतात. मात्र त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते.
■ वृत्तलेख लिहितांना विचारात घ्यायच्या बाबी
वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. कारण वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिराती मिळणे अवलंबून असते. या दोन्ही गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडित असतात. त्या दृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयाची निवड यांचा विचार करावा लागतो.
(अ) वाचकांची अभिरूची- आपले वाचक, त्यांची गरज, अभिरूची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन करावे लागते. एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते. त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरूची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरूचीचा विचार करावा लागतो.
(आ) तात्कालिकता- वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.
(इ) वेगळेपण- वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते.
(ई) वाचकांचे लक्ष वेधणे- वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. त्यात साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार करावा लागतो. सदर चित्रे कोठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायची आहेत हा विचार देखील करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्रे देखील समर्पक व चांगली असावी लागतात. कारण एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्याचे काम समर्पक चित्रे करत असतात. या संबंधीचे नियोजन केले आणि त्यासाठीचे कच्चेटिपण, संदर्भ तयार करून ठेवले, तर वृत्तलेख लिहिणे सुलभ होते.
(उ) वृत्तलेखाची शैली- वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. ‘कशावरती’ आणि ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घवाक्ये नसावीत. छोटी छोटी वाक्ये असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहीत आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना, हे लक्षात घ्यायला हवे.
समारोप
आधुनिक तंत्रज्ञानामुळे वर्तमानपत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्याचबरोबर सध्याच्या अत्यंत वेगवान बनलेल्या ‘ब्रेकिंग न्यूज ’च्या जमान्यात माध्यमांमुळे लोकांना घटना तात्काळ कळण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी हव्या असतात. अशा स्वरूपाची लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. वृत्तलेखांसाठी विशिष्ट रक्कमेचे मानधनदेखील दिले जाते. त्यामुळे बातमीच्या पलीकडचे आणि वाचकांची भूक शमवणारे लेखन करण्याची क्षमता मिळवली तर वर्तमानपत्रांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी निश्चित मिळू शकते.