मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गझल ,रंग माझा वेगळा

‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्त्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात. एरव्ही सर्वांना उन्हाच्या झळा लागतात; परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. दु:खाचा अनुभव तर नेहमीचाच असतो; परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशाप्रकारे मिळते, की त्याने आनंद वाटण्याऐवजी दु:खच वाटते. त्यामुळे गझलकाराला वाटत राहते, की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे; परंतु अशाही परिस्थितीत दु:खांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दु:खांनाही माझा लळा लागला असा गझलकाराचा अनुभव आहे. त्याने स्वत:ला ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. ‘सावल्यांच्या झळा’, ‘दु:खाचा लळा’, ‘मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ यांसारख्या परस्परविरोधी भावच्छटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभली आहे.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
                                                        सुरेश भट
काव्यसौंदर्य. माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा! या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही

नमुना गद्य आकलन
आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून कगर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अश खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हांस आजच्या साधन-सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्‌धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्‌धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात तो अभ्यास मी २ वर्षे ३ महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.
                        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अभिव्यक्ती. व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.

विंचू चावला

विंचू चावला’ हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारूडातील ‘विंचू’ हे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली, की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात, तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळेसुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्त्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारूडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल,तर तो सत्त्वगुणांचा लावा,म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा.मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल,असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारूडातून केला आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।

पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।

मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।

ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।

सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।
अभिव्यक्ती.
(अ) तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या.हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
(आ) ‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’,स्पष्ट करा.

जयपूर फूटचे जनक

नमुना गद्य आकलन....
नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या
पायाच्या जागी बसवला. नृत्याची कारकीर्दतिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’. जयपूरमधल्या एका रुग्णालयात
तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.
      जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडितजींना रुग्णालयात येण्याचं आमंत्रण दिलं.
     पंडितजींनी रुग्णालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं. ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ
होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला. डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली. त्या रुग्णाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं.
    आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थांचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अद्ययावत प्लास्टिक व ॲल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितजींचीच राहिली आहे.
                                         - डॉ. बाळ फोंडके
 अभिव्यक्ती.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगत्वावर मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.