समास


खालील वाक्ये वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या.
(१) सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात.
(२) त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले.
(३) सद्सद्‌विवेकबुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच.
(४) लंबोदराला मोदक प्रिय आहेत.
उदा. (अ) प्रतिक्षण -
(आ) राष्ट्रार्पण- 
(इ) योग्यायोग्य-
(ई) लंबोदर-
वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते, की वरील प्रत्येक शब्दात दोन वेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय, तसेच इतर शब्द गाळून वरीलप्रमाणे एक शब्द तयार करतो. उदा., ‘प्रतिक्षण’ हा शब्द प्रत्येक. क्षणाला या दोन शब्दांसाठी वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘सामासिक शब्दाचा विग्रह’ असे म्हणतात
समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला ‘पद’ असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून समासाचे चार प्रकार पडतात.

१) अव्ययीभाव समास-
(१) सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद प्रधान (महत्त्वाचे) असून ते बहुधा अव्यय आहे. 
उदा., गैर, यथा (आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात.)
(२) संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो. 
(३) ‘पावलोपावली’ या शब्दात अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. म्हणून या शब्दाचा समावेश ‘अव्ययीभाव’ समासात होतो.
उदा., पावलोपावली-प्रत्येक पावलावर यावरून असे लक्षात येते, की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा ‘अव्ययीभाव समास’ होतो.
(२) तत्पुरुष समास-
(१) या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे.
(२) सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात.यावरून असे लक्षात येते, की ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
(अ) विभक्ती तत्पुरुष समास
लक्षात ठेवा- सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययांऐवजी काही काही वेळा काही शब्दयोगी अव्यये वापरली जातात. ती अव्यये त्या त्या विभक्तीचे कार्य करतात. उदा., चतुर्थी- करिता, प्रीत्यर्थ, साठी, पंचमी-पासून, पेक्षा.विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये-
(१) सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.
(२) सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यये वापरली जातात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास ‘विभक्ती तत्पुरुष समास’ म्हणतात.
(आ) कर्मधारय समास
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये म्हणजे-
(१) दोन्ही पदे एकाच विभक्तीत (प्रथमा) असतात. उदा., मुखचंद्रमा
(२) कधी पूर्व पद (पहिले पद) विशेषण असते. उदा., कृष्णविवर
(३) कधी उत्तर पद (दुसरे पद) विशेषण असते. उदा., घननीळ
(४) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा., श्यामसुंदर
(५) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा., कमलनयन, नरसिंह
(६) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा., विद्याधन
ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यत: प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला ‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.
(इ) द्विगू समास
द्विगू समासाची वैशिष्ट्ये म्हणजे-
(१) द्‌विगू समासात पूर्वपद संख्याविशेषण असते.
(२) हा समास नेहमी एकवचनात असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो.ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास ‘द्विगू समास’ असे म्हणतात.
(३) द्वंद्व समास-
ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात.सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे तीन प्रकार पडतात.
(४) बहुव्रीही समास-
बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये म्हणजे-
(१) दोन्हीही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो.
(२) हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो.
(३) या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात.
उदा., (१) निष्कलंक- नाही कलंक ज्याला अशी ती. (व्यक्ती)
(२) नीलकंठ- निळा आहे कंठ ज्याचा असा तो. (शंकर)
ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो 
व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा ‘बहुव्रीही समास’ होतो.