जयपूर फूटचे जनक

नमुना गद्य आकलन....
नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या
पायाच्या जागी बसवला. नृत्याची कारकीर्दतिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’. जयपूरमधल्या एका रुग्णालयात
तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.
      जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडितजींना रुग्णालयात येण्याचं आमंत्रण दिलं.
     पंडितजींनी रुग्णालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं. ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ
होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला. डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली. त्या रुग्णाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं.
    आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थांचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अद्ययावत प्लास्टिक व ॲल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितजींचीच राहिली आहे.
                                         - डॉ. बाळ फोंडके
 अभिव्यक्ती.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगत्वावर मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.