विंचू चावला

विंचू चावला’ हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारूडातील ‘विंचू’ हे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली, की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात, तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळेसुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्त्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारूडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल,तर तो सत्त्वगुणांचा लावा,म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा.मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल,असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारूडातून केला आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।

पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।

मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।

ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।

सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।
अभिव्यक्ती.
(अ) तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या.हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
(आ) ‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’,स्पष्ट करा.