1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण

  1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण ( भाग 1 )
जागतिकीकरण म्‍हणजे काय?
        जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्‍परांशी जोडलेल्‍या जागतिक व्यवस्‍थेबद्दल आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. उदा., परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. तसेच आपल्‍याला मित्र-मैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्‍याही भागातून व्हॉटस्ॲप किंवा मोबाइलद्वारे संवाद साधता येतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून माल येतो.
      जागतिकीकरणाने राष्‍ट्र आणि राष्‍ट्रातील लोक एकमेकांशी जोडले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकाेन आहेत. एक मत असे आहे, की जरी आपण जागतिक पातळीवर  एकमेकांशी जोडले गेलो असलो, तरी ‘राष्‍ट्र’ व्यवस्‍थेचे महत्‍त्‍व कमी झालेले नाही. किंबहुना, राष्‍ट्रवादाला आजदेखील महत्‍त्‍व आहे. काही तज्‍ज्ञांच्या मते, तंत्रज्ञान आणि अर्थशास्‍त्राने राष्‍ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. त्‍यांच्या मते, राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्‍पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्‍त्‍वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्‍या मानवी समस्‍यांवर भर देतात, त्‍या राष्‍ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर कार्य करतात. 
आर्थिक घटक

आर्थिक क्षेत्रात झालेले काही महत्‍त्‍वाचे बदल-
(i) भांडवली गुंतवणुकीचा मुक्‍त संचार :
      गुंतवणूक हा अर्थव्यवस्‍थेतील एक महत्‍त्‍वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खासगी क्षेत्रांतूनदेखील होत असते. टाटा किंवा रिलायन्ससारख्या खासगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्‍यादी राष्‍ट्रांतदेखील गुंतवणूक करतात.
     ONGC सारख्या सरकारी कंपन्यादेखील परदेशात गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत.ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्हीक्षेत्रांत होताना दिसून येते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्‍प इत्‍यादींमध्ये गुंतवणूक केली आहे. त्‍याचबरोबर मॅकडोनल्‍ड, बर्गर-किंग, पिझ्झाहट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. 
     1990 च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्‍वचित होत होती.त्‍याकाळी सरकारी नियमांचे अडथळे होते. ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्‍हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्‍त संचार आहे.भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजून होते.
    भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये वित्‍तीय  गुंतवणूकीची गरज आहे. भारताच्या देशातांर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. म्‍हणूनच परदेशी गुंतवणूक गरजेची आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र, ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्‍त्‍वाचे आहे. कारण खरा विकास साधण्यासाठी रस्‍ते, रेल्‍वे, जलमार्ग, हवाईमार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचेआहे. म्‍हणूनच या क्षेत्रांतील गुंतवणूक अधिक महत्‍त्‍वाची आहे.
(ii) व्यापार या संकल्‍पनेत झालेले बदल :
1990  च्या दशकानंतर व्यापार या संकल्‍पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले आहेत.
(अ) 1948 पासून आंतरराष्‍ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे (GATT) च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती. तो व्यापारासंबंधीचा राष्‍ट्रांदरम्‍यान केलेला करार  होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची (WTO) निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमा शुल्‍क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्‍त करण्यासाठी राष्‍ट्रांना प्रोत्‍साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. आंतरराष्‍ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्‍या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्‍त व्यापारासाठी प्रोत्‍साहन देते, देशांदरम्‍यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशादेशांदरम्‍यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते.
(ब) व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो : 
    लोखंड, कोळसा, खनिज तेल यांसारख्या वस्‍तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यांसारख्या नाशवंत वस्‍तूंचा असू शकतो. 1990 च्या दशकात व्यापार या संकल्‍पनेला अधिक व्यापक स्‍वरूप दिले गेले. त्‍यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्‍हणजेच आता बँक, विमा यांसारख्या सेवादेखील व्यापाराचा भाग झाल्‍या आहेत. आज आपण त्‍याही पुढे जाऊन बौद्‌धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यांसारख्या गोष्‍टींचा समावेश होतो.
क) व्यापाराबाबत आणखी एक महत्‍त्‍वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटनेर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्‍या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्‍था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्‍ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
(iii) ट्रान्स-नॅशनल कंपन्यांचा उदय
       1990 च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खासगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्‍ध होती. जागतिकीकरणा मुळे यात बदल झालेला दिसून येतो. खासगी उद्योगांमध्ये वाढ होऊन ज्‍या खासगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्‍या त्‍या आता परदेशी व्यापार करू लागल्‍या. त्‍यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्स-नॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खासगी क्षेत्रांत झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला आहे?
(अ) कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्‍ट्रांतून दुसऱ्या राष्‍ट्रात स्‍थलांतर होताना दिसून येते. त्‍याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदा., बरेच कुशल आणि अर्धकुशल  कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका,युरोप इत्‍यादी ठिकाणी काम करत आहेत. खासगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात
रोजगाराच्या संधी वाढल्‍या आहेत. उदा., खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्‍यादी. 
(ब) दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला दिसून येतो. लहान  उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्‍पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालविली जातात ती त्‍या स्‍पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी देखील छोटे दुकानदार, भाजी  किंवा फळविक्रेते हे आजदेखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्‍या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. 
(क) तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्‍ती शिवाय थेट विकू शकतात. बहुराष्‍ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्‍या आहेत. उदा., भारत समुद्री उत्‍पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्‍या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू  इत्‍यादी गोष्‍टी निर्यात करत आहे.

राजकीय क्षेत्र
जागतिकीकरणाच्या संदर्भात पुढील राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित करता येते. 
(i) लोकशाहीचे महत्‍त्‍व : 
        1989 ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन यांच्याकडे कम्‍युनिझमचा झालेला अंत अशा स्‍वरूपात बघितले जाऐते. जग हे लोकशाही व्यवस्‍थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते. ‘सहभागी राज्‍य’, ‘नागरिक केंद्रित शासन ’ आणि ‘सुशासन’ या संकल्‍पना आता महत्‍त्‍वाच्या होत आहेत.लोकशाही व्यवस्‍थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासनव्यवस्‍थेत त्‍या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्‍थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो.
(ii) राज्‍याचे स्‍थान :    
     जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते , की आता राज्‍याचे महत्‍त्‍व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्‍व हा राज्‍याचा एक महत्‍त्‍वाचा घटक आहे.ही संकल्‍पना राज्‍याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्‍याच आधारे राज्‍याला आपल्‍या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्‍वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहेत असे मानले जाते. आंतरराष्‍ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. तर राष्‍ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव व त्‍यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्‍ट्रवाद, बिगर राष्‍ट्रीय घटकांचे कार्य तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी मिळालेले केंद्रस्‍थान ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत.
(iii) बिगर राजकीय घटक : 
     नागरी समाजाला मिळालेल्‍या वाढत्‍या महत्‍त्‍वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्‍हणूनच स्‍वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्‍थांना (Non-Government Organisations, NGO) महत्‍त्‍व प्राप्त झाले आहे. त्‍या संस्‍था मानवी समस्‍यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्‍ट्रीय संबंध हे केवळ राष्‍ट्रांच्या संबंधांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्‍यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे.ॲमनेस्‍टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मूव्हमेंटसारख्या संघटनां प्रमाणेच दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकांत सामील होतात.
(iv) मानवी हक्‍क : 
   जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्‍त्‍वाचा विषय बनला आहे, परंतु विकसित व विकसनशील देशांत मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्‍कां आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्‍तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्‍त्‍व अधिक आहे. उदा. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्‍त्र, निवारा, शिक्षण आणि स्‍वास्‍थ्‍य यांना प्राथमिक महत्‍त्‍व दिले आहे. असे ही मानले जाते की वितरणात्‍मक (distributive) न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्‍याणापेक्षा स्‍वातंत्र्याच्या हक्‍कांवर भर दिला जातो म्‍हणून राष्‍ट्रांना आपला इतिहास , संस्‍कृती, राजकीय व्यवस्‍था आणि अर्थव्यवस्‍था या आधारे मानवी हक्‍कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्‍यात नागरी आणि राजकीय हक्‍क, स्‍वातंत्र्य या पाश्चात्त्य दृष्टिकोनाला.प्रत्‍यक्षातील स्‍थानिक परिस्‍थितीची सांगड घालण्याची गरज आहे.
विचारप्रणाली 
शीत युद्धाच्या काळात विचारप्रणाली हा एक
महत्‍त्‍वाचा घटक होता. राष्‍ट्रांचे वर्गीकरण साम्‍यवादी किंवा समाजवादी तर भांडवलशाही किंवा मुक्‍त लोकशाहीप्रधान असे केले जात असे. सोव्हिएट रशिया , चीन आणि पूर्व युरोपीय राष्‍ट्रे ही साम्‍यवादी तर उत्‍तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्‍ट्रे ही भांडवलशाही असे गट झाले होते.विचारप्रणाली व अर्थव्यवस्‍था यांचा घनिष्‍ठ संबंध होता.विचारप्रणाली हा राजकीय घटक होता.प्रत्‍येक राष्‍ट्राची अर्थव्यवस्‍था त्‍या राष्‍ट्राच्या विचारप्रणाली नुसार आखली जात होती. उदा. पूर्व युरोपमध्ये साम्‍यवादी विचारप्रणाली प्रमाणे साम्‍यवादी अर्थव्यवस्‍था होती. अशा अर्थव्यवस्‍थेत सरकारी वा सार्वजनिक उद्योगक्षेत्राला प्राथमिक स्‍थान होते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती.आणि भांडवलशाही अर्थव्यवस्‍था होती. तिथे अर्थव्यवस्‍थेत खासगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते.भारतासारखे राष्‍ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्‍ट्र मानली जात.होती. म्‍हणून येथील अर्थव्यवस्‍थेत खासगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. या व्यवस्‍थेला ‘मिश्र अर्थव्यवस्‍था’ म्‍हटले जात असे अर्थव्यवस्थेत खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावशाली विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्‍था दिसून येते. त्‍या व्यवस्‍थेचे वर्णन ‘बाजारपेठीय अर्थव्यवस्‍था’ असे केले जाते. सर्वच राष्‍ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्‍थेचा अवलंब करत नाहीत.त्‍या बाजारपेठीय अर्थव्यवस्‍थेचे स्‍वरूप त्‍या राज्‍याच्या विचारप्रणालीवर  अवलंबून असते.उदा.अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणाली बरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्‍था आहे. म्‍हणून त्‍याचे वर्णन हे‘भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्‍था’ असे केले जाते.पश्चिम युरोपीय राज्‍यांमध्ये कल्‍याणकारी विचारसरणी आहे.म्‍हणून त्‍याचे वर्णन हे ‘कल्‍याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्‍था’ असे केले जाते. चीनी राजकीय व्यवस्‍था ही साम्‍यवादी विचारप्रणाली मानते, परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्‍थेत बदल झालेला दिसून येतो. आज चीनचे वर्णन हे ‘साम्‍यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्‍था’ असे केले जाते. भारतात बाजारपेठीय अर्थव्यवस्‍था हा शब्‍दप्रयोग न वापरता आपण ‘आर्थिक उदारीकरण’ हा शब्‍दप्रयोग वापरतो.
तंत्रज्ञान 
१९९० च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाइल, टेलिफोन, फॅक्‍स, इंटरनेट इत्‍यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणल

* भारतातील प्रसारमाध्यमात झालेला बदल - 
   1990  मध्ये CNN ने भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनेल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. उदा., आपण महाराष्‍ट्रात केवळ मुंबई आणि दिल्‍ली दूरदर्शची चॅनेल्‍स बघू शकत होतो.साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खासगी चॅनेल्‍स सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्‍याही शहरात,गावात ‘डीश अँटीना’च्या साहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले.संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी.टेलिफोन नसायचे, तातडीच्या.कामासाठी लोक पोस्‍ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत. आपल्‍या शहरा बाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्‍यानंतरच्या काळात Subscriber Trunk Dialling (STD) ची पद्धत सुरू झाली. आज मोबाइलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. मोबाइल फोन हे सरकारी तसेच खासगी कंपन्यांमार्फत उपलब्‍ध आहेत.
    तंत्रज्ञानातील सर्वांत महत्‍त्‍वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. जगात कोणाशीही कुठेही तात्‍काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्‍कृती आणि माहितीचा जगात प्रसार कोठेही करणे यामुळे शक्‍य झाले आहे. इंटरनेटच्या ‘सर्च इंजिन’ च्या माध्यमातून आपल्‍याला माहिती गोळा करता येते. तसेच ‘ट्विटर’, ‘स्‍काईप’, ‘फेसबुक’, ‘इन्स्‍टाग्राम’, ‘व्हॉटस् ॲप’च्या माध्यमातून सोशल ‘नेटवर्किंग’ची सोय उपलब्‍ध झाली आहे.
सामाजिक आणि सांस्‍कृतिक घटक
जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्‍धता यांमुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणेशक्‍य झाले आहे. याचबरोबर लोकांचे देशात आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्‍कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्‍याला ‘वैश्विक कॉस्‍मॉपॉलिटन संस्‍कृतीचा’ उदय होताना दिसत आहे.
      या वैश्विक कॉस्‍मॉपॉलिटन संस्‍कृतीवर पाश्चिमात्‍य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्त्यीकरण, सेक्‍युलरायझेशन ही मूल्‍ये पारंपरिक मूल्‍यांपेक्षा महत्‍त्‍वाची वाटू लागली आहेत. लोकांच्यावैयक्‍तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. उदा., खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्‍यादी फास्‍टफूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळी यांसारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्‍य प्रभाव दिसून येतो. ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’ सारख्या नवीन कल्‍पना पुढे येतात. तसेच ‘वेस्‍टर्न’ पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसतो.
 समाजात वाढत चालेला व्यक्‍तीवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्‍कृतीचा आणखी एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला होता. त्‍यात व्यक्‍तीवादानेभर घातली आहे. आज आपण ‘मला प्रायव्हसी पाहिजे’ किंवा ‘ही माझी खासगी (private) जागा (space) आहे’ अशा स्‍वरूपाचे उद्गार अगदी लहान मुलामुलींपासून वयस्‍कर लोकांपर्यंत ऐकतो. तसेच क्रेडिट कार्डमुळे आपल्‍या आवाक्‍याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्‍ती दिसते.