प्र.4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
लोकशाही समाजरचने मध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यांमुळे येते. भारतातील स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यांमुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवला आहे. सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकाची (public disorder) प्रमुख कारणे आहेत.
सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यांसाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यामध्ये शांतताभंग, दंगली,उठाव आणि नियमभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. याच्या अभावी देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात विविध गट असतातच,परंतु सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे.
राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आहेत.
• राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यांतील साधर्म्यामुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते.
• राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे.
• जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? ‘राज्य’ म्हणवून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यक असते.
• राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एकदिलाने एकत्र येतात. जगातील अनेक देश बहुवांशिक,बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्यासमस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता,लोकशाही यांसारखी मूल्ये तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात.
ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.